

पंढरपूर : पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजना गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडून आहे. अनेक लाभार्थ्यांचे कष्टाचे पैसे अडकून पडले आहेत. घर मिळण्याची प्रतीक्षा करताना नागरिकांना घरे मिळाली नाहीत. भरलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे पंढरपूरात आवास योजनेवरून वाद पेटला आहे. घरे मिळवून देण्यासाठी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या योजनेसाठी अनेक लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून हप्ते भरले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. हतबल झालेल्या नागरिकांनी अखेर भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. यावेळी शिरसठ यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
विक्रम शिरसट म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व बेघर नागरिकांना घर मिळावे. या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. मात्र पंढरपूरमध्ये स्थानिक नगरपालिका व ठेकेदार यांच्यातील दुमतामुळे योजना रखडली आहे. दहा वर्षे उलटूनही अनेकांना घरे मिळालेली नाहीत. या प्रकरणामुळे पंढरपूरमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर योजना पूर्ण करून लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. अडीच हजार घरे नगरपालिका व ठेकेदार यांच्यातील दुमतामुळे योजना रखडली गेली आहेत.