

सोलापूर : आषाढी वारीसाठी देशभरातून वारकरी पंढरपूरला येत असल्याने सोलापूर रेल्वे विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी दोन दिवस पाहणी दौरा करत सुरक्षा बळकट करण्याच्या सूचना केल्या.
सोलापूर विभागाची त्यांनी दोन दिवसीय व्यापक पाहणीत त्यांनी लातूर रोड-कुर्डुवाडी-मिरज या ३८५ किलोमीटर अंतराचा दौरा केला. यावेळी पायाभूत सुविधा, प्रवासी सोयीसुविधा व सुरक्षात्मक कामांचा आढावा घेतला. केली. यावेळी सोलापूरचे विभागीय प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा व अन्य अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाची तयारी, पाणीपुरवठा व गर्दी व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर देण्याचीही सुचना केली. लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, वॉशिंग-कम-पिट लाईन व अमृत भारत स्थानक योजनेच्या कामांचीही पाहणी केली. लातूर रोड-कुर्डुवाडी-मिरज मार्गाचे दुहेरीकरण, नवीन ब्लॉक स्थानके व कुर्डुवाडी जंक्शनवरील इंजिन रिव्हर्सल टाळण्यासाठी प्रस्तावित कॉर्ड लाईनच्या कामांबाबतही यावेळी चर्चा केली. यामुळे भविष्यात गाड्यांचा वेग वाढून विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.
कुर्डुवाडीत कवच प्रणाली कार्यालय व टीआरडी डेपोला भेट देत त्यांनी आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. रेल्वेने विकसित केलेले सेक्शन इन्सुलेटर अलाइनमेंट जिग व टॉवर वॅगनमधील अँटी-थेफ्ट अलार्म या उपक्रमाचे कौतुक केले. पूल, बोगदे व सिग्नलिंग प्रणालीची पाहणीही केली. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या सक्त सूचना उपस्थितांना दिल्या. रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी कार्ड लाईलची चर्चा करताना महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी येडशी येथील स्थानकाचे कौतुक केले व तेथील सुविधांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.