

सोलापूर : जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता अभियानाला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना कामे करण्यास आणखी वेळ मिळणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. त्याचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर होती. मात्र, राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने अभियानाकडे दुर्लक्ष करत अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मदत केली होती. त्यामुळे अभियानाची कामे मागे पडली होती. त्यामुळे शासनाने अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचा फायदा ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा परिषदेला होणार आहे.
दरम्यान, तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविली जात आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्यात सुशासन, असामाजिक न्याय यावर लक्ष केंद्रित केले जाते.
अभियानाच्या सुरुवातीच्या कालावधीत राज्यात उद्भवलेली पूर परिस्थिती तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे.