

माळशिरस : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज जिल्ह्यात आगमन झाले असून या सोहळ्यातील नातेपुते ते शिंगणापूर पाटी दरम्यान २० पुरुष व २१ महिला खिसे कापू व मोबाईल चोरांना ताब्यात घेतल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. दिंडीतील वाहने व इतर वाहन चालकांनी वाहने वाहतुकीस अडथळा होईल अशी लावू नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे, यावेळी एलसीबी चे पोलीस निरीक्षक जी. बी. जगताप, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे उपस्थित होते.
या वर्षी प्रथमच ५ जी मोबाईलचा वापर केला असून या मुळे अनेक अधिकारी ग्रुपला जोडले असल्याने सर्व माहिती तत्काळ मिळणे सुलभ झाले आहे. तसेच रिंगण ठिकाणी व मुक्काम ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस मदत केंद्र व वॉच टॉवर उभा करण्यात आले आहेत.
पालखी कुठे आली हे पाहण्यासाठी नागरिकांनी sp.solapur.gov.in या संकेत स्थळावरून माहिती घ्यावी. यावर्षी वारी मध्ये वाहनांची संख्या जास्त असून अनेक वाहने रस्त्यावर उभा केल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे . वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे. नागरिकांनी चोरापासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे