

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबुतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर, अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गात विशेष रचना करून पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले. तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही विहिरींची पाहणी गडकरी यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.