

सोलापूर : राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे तब्बल १३ हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या भरतीमुळे शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यातील सुमारे आठ हजार एकशिक्षकी शाळेतील काही शाळांना शिक्षक मिळणार आहे. त्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये सध्या केवळ एकाच शिक्षकावर संपूर्ण वर्गांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. शैक्षणिक गुणवत्ता राखताना शिक्षकांवरही मोठा ताण येत आहे. नव्या भरतीतून अशा शाळांना प्राधान्याने शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवित आली आहे. नवीन शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर रिक्त जागेवर आणि एकशिक्षकी शाळेवर आवश्यकतेनुसार शिक्षक देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांना मोठा फायदा
एकाच शिक्षकाकडे अनेक वर्गांची जबाबदारी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे कठीण होते. अतिरिक्त शिक्षक मिळाल्यानंतर अध्यापनासाठी पुरेसा वेळ, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सुमारे आठ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.