

सोलापूर : दिव्यांग शाळांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे तसेच ते नूतनीकरण बंधनकारक आहे. मात्र नूतनीकरण न केलेल्या राज्यातील जवळपास 350 पेक्षा जास्त दिव्यांग शाळा अडचणीत आल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 19 शाळांचा समावेश असून, त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन दिव्यांग आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी प्रमाणपत्र नूतनीकरण न केलेल्या राज्यातील 350 पेक्षा जास्त शाळा बंद करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक अनुदानित आणि 18 विनाअनुदानित अशा एकूण 19 दिव्यांग शाळांचा समावेश आहे.
दरम्यान, तत्कालीन दिव्यांग आयुक्तांनी आयुक्त कार्यालयातील अभिलेख तपासले होते. त्यामध्ये राज्यातील शेकडो दिव्यांग शाळांनी प्रमाणपत्राची नोंदणी न केलेले, प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याचे आढळले होते. त्यानुसार त्या दिव्यांग शाळा बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते.