

बार्शी : येथील ऋतिक मुकुंद आगरकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. ऋतिकची एका परीक्षेतूनच दुय्यम निरीक्षक वर्ग १, राज्यकर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन प्रतिष्ठित पदांसाठी एकाचवेळी निवड झाली. रोहन उकिरडे व योगेश गायकवाड यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली.
मध्यमवर्गीय कुटुंबातील ऋतिक गेल्या तीन वर्षांपासून शिस्तबद्ध अभ्यास करत होता. सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंतच्या दिनक्रमात दैनिक वाचन, चालू घडामोडींचे विश्लेषण आणि मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविल्याने त्याला हे तिहेरी यश मिळाले. ‘स्पर्धा परीक्षा म्हणजे मॅरेथॉन आहे. दररोज सुधारणा करा’, असा संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला. शिक्षक वडील मुकुंद आगरकर आणि आईच्या पाठबळामुळे हे शक्य झाल्याचे त्याने सांगितले. निकालानंतर त्यांच्या घरी अभिनंदनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील बाभुळगावचा रोहन श्रीमंत उकिरडे यानेही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्याची राज्य कर निरीक्षक वर्ग २ पदासाठी निवड झाली. शेतीची कामे करत कोचिंगशिवाय रोहनने अभ्यास केला. पुस्तके, ऑनलाईन टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारे त्याने हे यश मिळवले. तालुक्यातील सौंदरे येथील कष्टकरी कुटुंबातील योगेश भगवान गायकवाड याचीही कर निरीक्षकपदी निवड झाली. त्याने राज्यात २८५ गुण व ५२ वी रँक घेऊन यश संपादन केले. या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.