

पंढरपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरासदृश प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व कर्मचार्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्मचार्यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हीआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.
मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.