

सोलापूर : न्युरो फिजिशिअन (कै.) डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आठ दिवस होत आहेत. मात्र पोलसांच्या तपासाची चक्रे मनीषा मुसळे-मानेच्या भावेतीच फिरत आहेत. या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी ‘मास्टर माईंड’ आहे काय, याचा तपास सुरू आहे. यासाठीच मनीषाला पुन्हा पोलीस कस्टडीत घेण्यात आले. मात्र घटनेला सात दिवस उलटलेतरी (कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येमागील ‘मास्टर माईंड’ कोण याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. यामुळे पोलीस कुणाला वाचविण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जातोय.
(कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर दुसर्याच दिवशी मनिषाला अटक केली. मनीषाने केलेल्या धमकीच्या मेल मुळेच (कै.) डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद डॉ. आश्विन वळसंगकर यांनी दिली होती. (कै.) डॉ. शिरीष यांनी लिहलेली चिठ्ठीही सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणात मनीषाशिवाय आणखी कुणी यामध्ये सामील आहे का याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयास सांगत मनीषाला दोनदा पोलीस कस्टडीत घेतले. मात्र (कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येस आता सात दिवस उलटले तरी केवळ आणि केवळ मनीषाच्या भावेतीच तपासाची चक्रे फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‘मास्टर माईंड’ला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचार्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक हॉस्पिटलमध्ये मंगळवारी ठाण मांडून होते. हॉस्पिटल ऐवजी पोलीस स्टेशन येथे प्रत्येकाला बोलावून चौकशी करण्याची गरज होती, मात्र तसे न करता पोलिसांनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांच्या सोईनुसार जबाब घेतले. याबरोबर हॉस्पिटलमधील 27 कर्मचार्यांनी पोलिसांना मनीषाच्या विरोधात पत्रे दिली आहेत. ही पत्रे केवळ मनीषाच्या विरोधातच का दिली गेली, अन्य कुणाचे नाव कर्मचार्यांनी घेतले नाही का, ही पत्रे कर्मचार्यांनी स्वयंस्फूर्तीने दिली की कुणी द्यायला लावली याचा तपासही होण्याची गरज आहे. यातून या प्रकरणातील खरा ‘मास्टर माईंड’समोर येईल अशीही चर्चा आहे.
या प्रकरणी मनीषाच्या भोवती तपासाचा फास आवळला जात आहे. मात्र मनीषाने मला सोडून वळसंगकरांच्या कौटुंबिक कलहाकडेही लक्ष देण्याची मागणी पोलीस तपासात केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र त्या अनुषंगाने वळसंगकर कुटुंबीयातील सदस्यांची केवळ जुजबी चौकशीच झाली आहे. त्यांच्याकडे तपास करण्यासाठी ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत, असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे मनीषाला तोफेच्या तोंडी देऊन कुणाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय.