

सोलापूर : यंदाच्यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट कहर केला असून, मार्च महिन्यातील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला आहे. यात महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार 2439.05 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्ष, गहू, आंबा, डाळिंब यासारख्या नगदी पिकांचा नुकसानीत समावेश आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा समस्या निर्माण झाल्याने वातावरणात सातत्याने बदलत आहे. कधी अधिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूर व अतिवृष्टी झाली. आता यंदाच्या वर्षी देखील गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. या गारपीटीचा फटका जिल्ह्यातील 170 गावांना बसला असून त्यातून 3423 शेतकरी बाधित झाले आहेत. यात 264.7 हेक्टर वरील जिरायती पिके तर 830.75 हेक्टर वरील बागायती पिकांची नुकसान झाली आहे.
फळ पिकाच्या सर्वाधिक नुकसान झाले असून यात 1343.6 हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्रावरील फळपिकांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ गावांना गारपिटीचा तडाका बसला असून, 429 शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात द्राक्षे, आंबा, केळी, खरबूज, ढोबळी मिरची, ज्वारी हरभरा, गहू, डाळिंब यासारख्या 227.45 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 42 गावातील 468 शेतकरी बाधित झाले आहे. यात आंबा, गहू, केळी, हरभरा, भोपळा, कलिंगडसह 289 हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील 19 गावातील 1074 शेतकऱ्यांना गारपिटीचा तडाका बसला असून, 645 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर माढा तालुक्यातील दहा गावातील 97 शेतकरी बाधित झाले असून 58 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील एका गावातील दोन शेतकरी बाधित झाले असून दोन शेतकऱ्यांचे तीन हेक्टर वरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील 197 शेतकरी बाधित झाले असून 349 हेक्टर क्षेत्रावरील पिके नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यातील 32 गावातील 825 शेतकरी बाधित झाले असून 621 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील 37 गावातील 31 शेतकरी बाधित झाले असून 245 हेक्टर क्षेत्रावरील मका, दोडका, द्राक्ष, लिंबू, आंबा, डाळिंब, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे.