

पोखरापुर : स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून एकाला दि. 21 रोजी दोघांनी काठीने मारहाण करत शिवीगाळ केली होती. त्या घटनेच्या पहाटे तीन वाजल्यापासून संबंधित व्यक्ती बेपत्ता होता. अखेर त्यांचा मृतदेह दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी मोहोळ तालुक्यातील वाळूज गावच्या हद्दीतील नदीपात्रात आढळून आला.
या प्रकरणी तिघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय भागवत जगझाप (दहिटणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. दीपक कोळी, भुजंग कोळी व निर्मला कोळी (सर्व रा. दहिटणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील विजय भागवत जगझाप हे आई-वडील पत्नी दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी मजुरीसाठी मुलांना घेऊन पुणे येथे गेली होती. दि. 21 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दीपक कोळी व भुजंग कोळी (दोघे रा. दहिटणे, ता. बार्शी) यांच्या स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याप्रकरणी विजय यास दोघांनी काठीने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती.
त्यानंतर विजय यांचा भाऊ योगेश जगझाप यांनी गाडीचे नुकसान भरून देतो, असे सांगितले होते व विजयला समजावून एका खोलीमध्ये बसवून बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर योगेश याला झोप लागली. पहाटे तीनच्या सुमारास पाहिले असता विजय हा त्या रूममध्ये नव्हता. त्याची सर्वत्र शोधाशोध केली. दरम्यान, विजयची पत्नी पुण्यावरून आल्यानंतर त्यांनी विजयची शोधाशोध केली. तसेच दीपक कोळी, भुजंग कोळी यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांनी कोमल विजय जगझाप यांना जातिवाचक शिवीगाळ करून तुझ्या नवऱ्याने आमच्या गाडीची काच का फोडली? असा जाब विचारत त्याला उद्याचा दिवस दिसू देणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर जगझाप कुटुंबीयांनी दि. 23 फेब्रुवारी रोजी वैराग पोलिस ठाण्यात विजय जगझाप हे हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही त्यांचा शोध चालूच होता. दरम्यान, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांचे प्रेत मोहोळ तालुक्यातील वाळूच्या नदीमध्ये आढळून आले. याप्रकरणी कोमल विजय जगताप रा. दहिटणे, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.