

सोलापूर : राज्यातील सरकारी रुग्णालयांत असलेली सध्याची डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी डॉक्टरांसह कर्मचारी ९८४० पदे भरण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात ८०० डॉक्टरांची भरती लवकरच केली जाईल. या भरती प्रक्रियेची जाहिरात सुद्धा या विभागाकडून लवकरच प्रसिद्ध होईल. उर्वरित ९०४० जागांसाठी दंतचिकित्सकांसह इतर वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांचीही भरती प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होईल. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक नुकतेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाईन घेतली. या बैठकीत डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, रुग्णांशी योग्य संवाद साधतात का, रुग्णालयांत आवश्यक औषधांचा साठा व सेवा उपलब्ध आहेत का, याचीही त्यांनी माहिती घेतली.
डॉक्टरांच्या या नवीन भरतीनंतर जिल्हा आणि तालुका स्तरावरील रुग्णालयांवरील ताण कमी होऊन नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच सध्या होणारी अरोग्य विभागाची ओढाताण कमी होण्यास मदत होणार आहे.