

सोलापूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ५८ टक्क्यांवर असलेला महागाई भत्ता आता ६० टक्के झाला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ९६५ शासकीय कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी, अशा एकूण १४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. वित्त विभागाने याबाबत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट २०२६ च्या वेतनासोबत मिळणार असून १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या सात महिन्यांची थकबाकीही अदा केली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात म्हणजे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हाती पगारासोबत अतिरिक्त रक्कम येणार आहे.
महागाई वाढत असताना झालेल्या या दोन टक्के वाढीमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थकबाकीची रक्कम मिळणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.