

पोखरापूर : आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्यांसाठी सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी दिवस रात्र काम करत आहोत. जनतेसमोर कोणीही नाही, जनता जनार्दनच सर्व काही आहे, इथे मालक कोणी नाही. फक्त जनता हीच मालक आहे, शेतकऱ्यांचा सरकारच्या तिजोरीवर सर्वात अगोदर अधिकार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी योग्यवेळी कर्जमाफी देवू असे सांगत या भागात पालखी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, उजनी डावा कालव्याची दुरुस्ती, कृषी प्रक्रिया उद्योग यासाठी निश्चित मदत करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पेनूर जिल्हा परिषद गट व पेनूर पंचायत समिती तसेच टाकळी पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पेनुर येथे झाली. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार राजू खरे, पेनूर गटाचे उमेदवार चरणराज चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व कुरुल गटाचे उमेदवार उमेश पाटील, नरखेड गटाचे संतोष पाटील, साईनाथ अभंगराव, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, पद्माकर देशमुख,मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, पेनुर चे सरपंच सुजित आवारे, महेश चिवटे,सुनिल पाटील, समाधान पाटील, बाळासाहेब चवरे, बाळासाहेब गवळी, बालाजी चवरे, अक्षय सावंत, दिपक गवळी, टाकळी सिकंदर गणाच्या उमेदवार स्वाती गवळी, पेनुर गणाच्या प.स.च्या उमेदवार संगिता वसेकर, राजकुमार हिवरकर आदींसह शिवसेनेचेपदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणल्या. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. आम्ही सर्वसामान्यांचे दुःख जाणून त्यांच्या दुःखात सहभागी होतो. मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी कसल्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही. तालुक्यात ज्या ज्या सुविधा देणे आवश्यक आहेत त्यांना प्राधान्य देऊ. या निवडणुकीत विकासात्मक ध्येयधोरणे राबविणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व तुतारीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन ही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.