

करमाळा : करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथील तरुण जयराज पिंटू येवले (वय 20) याचा कर्नाटक येथे झालेल्या अपघातात गुरुवारी (ता.31 जुलै) रोजी मृत्यू झाला आहे. तो गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कांदा घेऊन जाणार्या मिनी ट्रकच्या सोबत तो कर्नाटक येथे गेला होता. कांदा खाली करून रिकाम्या ट्रकने तो गावाकडे परतत होता.
यावेळी कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यामध्ये झालेल्या कंटेनर सोबतच्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. याची खबर बिटरगाव येथे मिळताच बिटरगाव येथे शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी त्याचे शव बिटरगाव श्री येथे आणले. यावेळी पांडुरंग वस्तीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वडील, आजी, आजोबा, एक बहीण असा परिवार आहे. बालपणीच त्याच्या आईचे दुर्दैवी निधन झाल्याने त्याचा आजी आजोबाने सांभाळ केला होता. तो कांद्याच्या ट्रकसोबत कर्नाटक येथे गेला होता, मात्र दुर्दैवाने काळाने त्याला तेथेच गाठले. होतकरू तरुणाच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.