

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे जेवढी मते आहेत त्यापेक्षा २०० अधिक मते घेऊन राजेंद्र राऊत हे निवडून येतील. व्हीप बजावणे, ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणालाही घाबरत नाही. भाजपचे सर्व मतदार ठाम आहेत असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाच्या तपपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदे नंतर पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर, सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केले. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार असलेल्या भाजपने आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी व्हीप बजावला आहे. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे, असे सांगून विरोधक घरी झोपतात; म्हणून त्यांना घरी बसण्याची वेळ आली टीका त्यांनी विरोधकांवर केली.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपल्या सर्व ३१६ मतदार सदस्यांना भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या स्वाक्षरीने हा व्हीप जारी करण्यात आला आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
महामार्ग ठेकेदाराला सोडणार नाही
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथील अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला. पण, त्या विहिरीला संरक्षण कठडा असता तर अपघात झाला नसता. महामार्गाचे काम करणारा जो ठेकेदार आहे, त्याला अनेकदा नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले, त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे, त्या ठेकेदाराला सोडलं जाणार नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या विहिरींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विहिरींना संरक्षक कठडे करावे लागतील, तर काही विहिरी बुजवाव्या लागतील असे त्यांनी सांगितले.