

सोलापूर : ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जलजीवन योजनेचे जल सेवा आंकलन उपक्रम अंतर्गत मूल्यमापन होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे कार्यक्षमता मूल्यांकन ठराविक कालावधीत तृतीय पक्ष सर्वेक्षणांद्वारे करण्यात येत होते. मात्र गावपातळीवरील पाणी सेवांसाठी सतत, स्थानिक मालकीची व पारदर्शक देखरेख यंत्रणा संस्थात्मक करणे आवश्यक असल्याने ङ्गजल सेवा आंकलनफ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जल सेवा आंकलन म्हणजे गावातील पाणी पुरवठा सेवांची कामगिरी ग्रामपंचायत व गाव पाणी व स्वच्छता समितींच्या नेतृत्वाखाली पद्धतशीरपणे मूल्यांकन करणे होय. या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले आहे. या मूल्यांकनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणी पुरवठा नियमितपणे, पुरेशा प्रमाणात व स्वीकार्य गुणवत्तेनुसार मिळत आहे का, तक्रारींचे निवारण कसे होत आहे, वापरकर्ता शुल्क संकलनाची स्थिती, तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची संचालन व देखभाल याबाबतची माहिती नोंदविण्यात येणार असल्याचे सीईओ जंगम यांनी सांगितले.
एक हजार 8 गावांत राबविणार उपक्रम
जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ घोषित जिल्ह्यातील एक हजार 125 मधील एक हजार 8 गावांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरीय जल जीवन मिशन उपक्रमाचे सक्रिय नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे. जल सेवा आंकलन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा व अधिकारी यांनी समन्वयाने कामे करावे, असे आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव यांनी केले आहे.