

सोलापूर : होळी उत्सव व उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत वाढणारी प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दौंड-कलबुर्गी दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष रेल्वे गाड्यांची सेवा 15 जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोलापूरसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी विशेष गाड्यांच्या 274 विशेष फेऱ्या वाढवलेल्या आहेत.
गाडी क्रमांक 01421 व 01422 दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी आठवड्यातून गुरुवार व रविवार वगळून पाच दिवस धावत होती. ती आता येत्या 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली. या कालावधीत या गाडीच्या 196 फेऱ्या होतील. तसेच गाडी क्रमांक 01425 व 01426 दौंड-कलबुर्गी दरम्यान धावणारी द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडीही 15 जुलैपर्यंत धावेल. या गाडीच्या 78 फेऱ्या करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे व रचनेत कोणताही बदल केलेेला नाही. प्रवाशांना प्रवासा दरम्यान त्यांच्याकडे वैध तिकीट घेणे आवश्यक असून अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे स्टेशनवरील बुकिंग काऊंटर तसेच रेलवनच्या मोबाईल प्रणालीद्वारे सुद्धा काढता येतील. यामुळे सोलापूर, दौंड व कलबुर्गी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल. सण व सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना आपला प्रवास अधिक सुलभ होईल.