

सोलापूर : नामा म्हणे केशवराजा | केला नेम चालवी माझा ॥ या संतोक्तीप्रमाणे नित्यनेम भजनासह भव्य माघवारी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. रविवारी 25 रोजी सकाळी 8 वाजता विठ्ठल मंदिर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथून तिऱ्हे मार्गे पंढरीकडे मार्गस्थ होईल.
प्रारंभी दुपारी सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर या माघवारी दिंडीचा पहिला अश्व रिंगण सोहळा शनिवारी दुपारी 3 वाजता पार पडला. सुरुवातीला पारंपरिक इतर रिंगण पूर्ण करून शेवटी अश्व रिंगण सुरू झाले. सोहळा पाहण्यासाठी हजारो महिला भाविक व पुरुष, आबाल वृद्धांची गर्दी झाली होती. अखिल भाविक वारकरी मंडळाकडून जोतिराम चांगभले, बळीराम जांभळे, संजय पवार, मोहन शेळके पदाधिकारी यांनी गोल रिंगण लावून घेतले. नामदेव पूलगम, विष्णुपंत मोरे महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिंगणातील अश्व पूजन करून गणेश भंडारे, गजानन जगताप (चोपदार) यांचा सन्मान केला.
माघवारी दिंडी सोहळ्यास दोनशे वर्षांची परंपरा
माघवारी निमित्त सोलापुरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. 200 वर्षा पेक्षा जास्त काळ ही वारी परंपरा टिकून आहे. शहरातील 33 दिंडी, परिसरातील 25 दिंडी आणि 25 भजनी मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन निळोबा जांभळे महाराज, सुमंत शेळके व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांच्या हस्ते झाले. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सुरेश फलमारी यांच्याकडून विणेकरी महाराजांचा सन्मान झाला.