

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पाच लाख जनावरांना लम्पीचे लसीकरण केले आहे. त्यामुळे लम्पीचा धोका टळणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण माळशिरस तालुक्यात झाले आहे.
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. डासांमुळे लम्पीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गाय वर्ग जनावरांना याचा सर्वाधिक धोका असल्याने जिल्ह्यातील गाय वर्ग, म्हैस वर्ग जनावरांना लम्पीचा डोस दिला आहे.
जिल्ह्यात जवळपास नऊ लाख जनावरे आहेत. त्यातील पाच लाख 11 हजार जनावरांना लम्पीचा डोस दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गाय वर्ग, म्हैस वर्ग जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लम्पी आजाराचा धोका गाय वर्ग म्हणजेच गाय, बैल, कालवड, खोंड या जनावरांना जास्त आहे. त्यामुळे प्राधान्याने गाय वर्ग जनावरांना लम्पीचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, लंपी हा आजार संसर्गजन्य आहे. लम्पी झालेल्या जनावरांना डास चावला आणि तोच डास दुसर्या जनावरांना चावल्यास त्या जनावरांना लम्पीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लम्पी आजाराची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांजवळ न बांधता दुसर्या ठिकाणी बांधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.