

सोलापूर : उजनी धरणाचे पाणी वापरणाऱ्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख लोकांना कर्करोगाशी संबंधित विषाणूंची बाधा झाली आहे. धरणातील पाणी पिण्यायोय नाही अशा आशयाचा ८० पानी अहवाल उजनी धरणातील पाण्याविषयी संशोधन करणाऱ्या सृष्टी इकोव्हिजन फाऊंडेशनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी सोलापूर महापालिकेस दिला आहे.
उजनी धरणात पुणे महानगरपालिकेकडून ड्रेनेजचे सांडपाणी, तसेच मुळा-मुठा नदीमार्गे दूषित पाणी भीमा नदीमध्ये सोडले जाते. पिंपरी-चिंचवड परिसरातील सांडपाणी देखील मुळा-मुठा नदीत मिसळून पुढे भीमा नदीत येते. नीरा नदीमध्ये देखील कत्तलखान्यासह साखर कारखान्यातील दूषित तसेच अनेक गावांचे सांडपाणी सोडले जाते. ते पाणी पुढे उजनी धरणात पोहोचते. त्यामुळे धरणातील पाणी अधिकच दूषित होत आहे.
पुण्याजवळील चाकण एमआयडीसीमधून उद्योगांतील वापरानंतर शुद्ध न केलेले, रासायन मिश्रित पाणी थेट भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याचे या अहवालात नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे कुरकुंभ एमआयडीसीमधील काही कारखान्यांचे रासायन मिश्रित सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता भीमा नदीमध्ये सोडले जात असून ते पाणी पुढे उजनी धरणात मिसळले जात असल्याचेही तज्ज्ञांनी अहवालात नमूद केले आहे.
सदरचा अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे देताना यशवंत पाथरुट, सागर अतनुरे, पर्यावरण संरक्षण गतीविधीचे प्रांत मंडळ सदस्य प्रवीण तळे सृष्टी इकोव्हिजन फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
स्थानिक प्रजातींचे मासे होताहेत नष्ट
उजनी धरणातील स्थानिक प्रजातींचे मासे रसायन मिश्रित पाण्यामुळे नष्ट होत आहेत. याउलट मांगूर, किटफिश, तिलापिया, सकर माऊथ कॅटफिश अशा अधिक आक्रमक असलेल्या प्रजातींची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणीय समतोल ढासळत आहे. जलकुंभ, इपोमिया यासारख्या वनस्पतींची आक्रमकपणे वाढ होत असल्याने पाणथळ जमीनीवरील स्थानिक प्रजाती नामशेष होत आहेत, असेही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.