

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून आठ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच, येत्या २ ऑगस्टपासून सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार असून शहरातील उड्डाणपूल आणि होटगी येथील आयटी पार्क प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागाने एमआयडीसीला विना मोबदला हस्तांतरण करण्यात आल्याचेही गोरे यांनी सांगितले.
कृषी पंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा होणार असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अल निनोमुळे वीजपुरवठा आधी दोन तास आणि त्यानंतर पाच तास केला होता.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूर–मुंबई विमानसेवा येत्या २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सोलापूर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पाबाबतचे सर्व अडथळे दूर झाले, असून जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक शासकीय जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. महापालिका ही लोकांची आहे. यात नाला सफाई गडबड झाली नसल्याचे गोरे यांनी सांगितले.
भय्या चौक येथील रेल्वे पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे, याबाबत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत रेल्वेसह संबंधित विभागासोबत येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे सांगितले.