

सोलापूर : विधान परिषद सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदार संघात मतदारसंघात 616 मतदार आहेत. आमच्याकडे 600 मतदारांची अदृश्य शक्ती पाठीशी आहे. शरद पवारांच्या आदेशाने वसंतराव देशमुख हे महाविकास आघाडी म्हणून भाजपविरोधात रिंगणात असल्याचे उत्तर खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले.
मतदारांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि नेत्याने दिलेल्या आदेशाप्रमाणे मी वागतोय. आमच्याकडे 616 पैकी 16 मत आहेत का असे जर विरोधक विचारत असतील तर मी आता 16 मतांपासून सुरुवात करतो, असे ते म्हणाले.
पालकमंत्री गोरे यांनी गुरुवारी (4 जून) बोलताना मोहिते पाटील यांचे उल्लेख न करता तुमच्याकडे 16 मते आहेत का अशी खोचक टीका केली होती. त्यावर शुक्रवारी (5 जून) सोलापुरात उमेदवार वसंतराव देशमुख, खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पालकमंत्री गोरे यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केवळ टीव्ही, वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. प्रत्यक्षात आम्हाला कुणीही भेटले नाही. चर्चा केली असती तर चित्र वेगळे राहिले असते, असे खा.मोहिते-पाटील यांनी सांगितले.
लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेला आदेश मान्य केलाय. पुरोगामी विचार टिकला पाहिजे. त्यादृष्टीने तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. पुरोगामी विचार लोकांमध्ये गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. तो आदेश मी पाळलाय. पक्षांतर्गत विषय हे आमच्या घरातले प्रश्न आहे. तो आम्ही घरात बसवून मिटवू. घरातील विषय आम्ही चव्हाट्यावर मांडत नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी कोणाचा फोन आला नाही. हुकूमशाही आहे का? आम्ही निवडणूक लढायची नाही का? असा सवालही मोहिते -पाटील यांनी केला.
वसंत देशमुख हे सुधाकरपंत परिचारीक आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत. सुधाकरपंत यांचे त्यांना सहकार्य राहिलेले आहे. त्यामुळे ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर गेले होते. माझ्यामागे 600 अदृश्य मते आहेत. पुढे काय होतंय हे पाहू. आमच्यामागे महाविकास आघाडीतील कोण आहे, निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल, असेही मोहिते-पाटील यांनी सांगितले.