

पंढरपूर : शेतकर्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या 5 वर्षात दरवर्षी 5 हजार अशी 25 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आ. विजय देशमुख, आ. रणजीत मोहिते-पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषीसह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.
दरम्यान, आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी, यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजनपासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजार साखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे, अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकर्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल, असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतेच पीक विमा योजना सुधारित केली आहे.
गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही. यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले की, ही बाजार समिती एक अग्रेसर बाजार समिती आहे. 550 कोटीच्यावर उलाढाल या बाजार समितीच्या माध्यमातून केली जाते. बेदाण्याचे मोठे मार्केट या बाजार समितीत आहे. चांगल्या प्रकारची शेती या भागातील शेतकरी करतात. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर हे भविष्यकाळातील एक मोठे तीर्थक्षेत्र होण्यासाठी ध्यास घेतला आहे. यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे संचालक मंडळ आदी उपस्थित होते.