

सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींना योजना हस्तांतरण करण्यात येणार आहे. प्रारंभी मंगळवेढ्यातील अरळी, अक्कलकोट तालुक्यातील तोरणी गावात जल अर्पण दिवस साजरा करुन योजना हस्तांतरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
सीईओ जंगम म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा लोक सहभाग अधिक दृढ करणे, पाणी पुरवठा योजनाचे संचालन आणि देखभालीसाठी आत्मविश्वास निर्माण करणे, प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वचन बद्धकरता जल जीवन मिशन अंतर्गत झालेली पाणीपुरवठा योजना गावाला हस्तांतरण करण्यात येणार आहे. तसेच तो दिवस जल अर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगती पथावर सुरू आहेत. ज्या गावात योजनेचे कामे पूर्ण झाली आहेत. तेथील योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे.
जिल्हयातील तोरणी (ता.अक्कलकोट) व अरळी (ता. मंगळवेढा) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रविवार (दि.15) फेब्रुवारीला दोन गावात जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये गावातील पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात येणार असल्याचे सीईओ जंगम यांनी सांगितले.