

सोलापूर : मागील आठवड्यात गायब झालेल्या थंडीने पुन्हा कमबॅक केले असून, किमान तापमानात घट होऊन पहाटेच्यावेळेस थंडी वाढली आहे. गेल्या शुक्रवार, दि. 23 जानेवारीपासून सोलापूरसह राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरणही निवळले आहे. 24 जानेवारी रोजी 16.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजे 26 जानेवारीपर्यंत किमान तापमानात घट होऊन गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवार, दि. 20 जानेवारीपासून थंडी काहीशी कमी झाली होती. सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या वातावरणात आता बदल झाला आहे. थंडीचा कडाका पुन्हा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 27 किमी वेगाने आर्द्रतायुक्त वारे वाहत होते. यामुळे दमट चक्राय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 27 किमी वेगाने आर्द्रतायुक्त वारे वाहत होते. या दमट वाऱ्यांमुळेच गेल्या 3 दिवसांपासून थंडी गायब होऊन दमट आणि ढगाळ वातावरण तयार झाले होते.