

सोलापूर : श्रावण महिना सुरू असल्याने नारळाच्या दरात वाढ झाली आहे. असे असले तरी पावसाने ओढ दिल्याने बाजारातील मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यामुळे नारळाची आवक आणि विक्री दोन्हीमध्ये घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यापूर्वी सोलापूरच्या बाजारात दररोज सुमारे २ ते २ लाख २० हजार नारळांची आवक होत होती. त्यापैकी सुमारे दोन लाख नारळांची विक्री होत होती. सध्या मात्र दररोज जवळपास १ लाख २० हजार नारळांची आवक होत असून, त्यातील सुमारे एक लाख नारळांची विक्री होत आहे. दररोज सुमारे ३० हजार नारळ घेऊन येणारे चार ट्रक सोलापूर बाजारात दाखल होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या मागणीत यंदा विशेष वाढ झालेली नाही. शहराच्या पूर्व भागात काही प्रमाणात मागणी वाढते.
मात्र ही वाढ लक्षणीय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोलापूरला प्रामुख्याने तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होते. नारळाच्या आकारानुसार दर आहेत. सध्या प्रत्येक नारळामागे आठ ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात नारळाचा दर २३ रुपयांपर्यंत आहे. तर किरकोळ बाजारात आकारानुसार ३० ते ५० रुपयांपर्यंत नारळ विकला जात आहे. कोट श्रावणामुळे नारळाच्या दरात वाढ झाली आहे.