

सोलापूर : काँग्रेसच्या सृजन अभियानावरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सोलापुरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा नारा दिला. अभियानाच्या नियोजनात गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे पक्षात नाराजी वाढल्याचा आरोप जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. या विरोधात राजीनामे देणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कौलगे-पाटील, संजय चौगुले या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. संघटन सृजन अभियानातून पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार देवाशिष पटनायक यांनी दिल्लीला वस्तुनिष्ठ अहवाल दिल्याचा दावा करत त्यात राजकारण झाल्याचा आरोप नाराज गटाने केला. गडबड झाली असल्यास पाठपुरावा करेन, असे पटनायक यांनी सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.