

पंढरपूर : उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 40 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरणदेखील शंभर टक्के भरले असल्याने यातूनही 42 हजार 724 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. या दोन्ही विसर्ग (82724) संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पूरसद़ृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. हा विसर्ग बुधवारी सकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उजनी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी सायंकाळी 5 वाजता 25 हजार क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढले आहे. वीर धरणातूनही दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन तो 42724 क्युसेक इतका सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीपात्रात 82 हजार 724 चा विसर्ग सुरू आहे.
नीरा व भीमा नदीचा येथे संगम होत आहे. त्यामुळे भीमा नदीला पाणी वाढणार आहे. भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्व नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, अशा सूचना कार्यकारी अभियंता भीमा व नीरा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत चौथ्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती
पंढरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ओढे, नाले म्हणावे तसे भरुन वाहिले नाहीत. तरीदेखील पंढरपुरातील चंद्रभागा नदीला जूनपासून आतापर्यंत चौथ्यावेळी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडला की भीमा नदीला पूर येत आहे.