

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर बी टू मधील कामगारांच्या जागा शासनाकडून कामगारांच्या नावावर विनामूल्य करून देणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अंबादास करगुळे, विजया खरात, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आणि कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर आ. देवेंद्र कोठे, उमेदवार अंबादास करगुळे, विजया खरात, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे आदी उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, बी टू मध्ये असलेल्या कामगार चाळींमधील जागा कामगारांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तातडीने याबाबत शासकीय स्तरावर बैठक लावून हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आ. कोठे यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करून प्रभागात असलेल्या जुनी मिल चाळ, लक्ष्मी चाळ, पाटील चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ, वारद चाळ, एनजी मिल चाळ,जुनी पोलीस लाईन, धरमशी लाईन यासह मुरारजी पेठ येथील अन्य कामगारांच्या चाळी व मिळकतींवरती चुकीच्या प्रकारे बी टू (सत्ता प्रकार ब) लागल्यामुळे कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आचारसंहितेनंतर तातडीने बैठक लावून हा विषय एकही रुपये शासकीय कर न घेता पूर्णपणे निकाली काढून देण्याचा शब्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेमध्ये दिला. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.