

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी 11 कोटी (10 कोटी 84 लाख) रुपयांचे दान केले. तसेच सोन्या, चांदीचे 2 कोटी 59 लाख रुपयांचे दागिने अर्पण केले. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आषाढी यात्रा एकादशीला भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिराच्या उत्पन्नातही भरीव वाढ झाली. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या. आषाढ शुद्ध 01 (दि. 26 जून) ते आषाढ शुद्ध 15 (दि. 10 जुलै) या कालावधीत भाविकांनी भरभरून दान दिले आहे.
श्रीं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणाजवळ 75 लाख पाच हजार 291 रुपये अर्पण केले. दोन कोटी 88 लाख 33 हजार 569 रुपये देणगी दिली. 94 हजार चार हजार 340 रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले. 45 लाख 41 हजार 458 रुपये भक्तनिवास भाडेपोटी मिळाले. एक कोटी 44 लाख 71 हजार 348 रुपये हुंडीपेटी, तीन कोटी 24 लाख 56 हजार 82 रुपये परिवार देवता, दोन कोटी 59 लाख 61 हजार 768 रुपये सोने-चांदीचे दागिने अर्पण स्वरूपात मिळाले. अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून एक कोटी 24 लाख पाच हजार 75 रुपये व इलेक्ट्रिक तीन रिक्षा आणि बस भाड्याच्या माध्यमातून 32 लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीस प्राप्त झाले.
गत वर्षीच्या सन 2024 च्या आषाढी यात्रेत आठ कोटी 48 लाख 58 हजार 560 तर या वर्षीच्या यात्रेत 10 कोटी 84 लाख आठ हजार 531 रुपये उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटी 35 लाख 49 हजार 971 रुपये उत्पन्न वाढीव मिळाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या वारकरी, भाविकांना या दानाच्या रक्कमेतून पुरेशा सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.