

सोलापूर : पुढील महिन्यात आषाढी वारी आहे. त्याविषयी सर्व विभागाच्या पूर्वतयारीविषयी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी आढावा घेऊन आषाढी वारीच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध विभागांच्या कामांचा आढावा, अर्थसंकल्पीय तरतुदी, ग्रामीण विकास निधी तसेच आगामी आषाढी वारीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला मागील स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. तसेच त्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यात आला. शासनाकडून प्राप्त विविध परिपत्रके व शासन निर्णयांची नोंद घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, स्थायी समिती सदस्य शांभवी कल्याणशेट्टी, बालाजी नरोटे, रमेश भांजे, डेप्युटी सीईओ स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे आदी उपस्थित होते.