

पंढरपूर : आषाढी यात्रेकरिता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहीर परिसरात रिंगणाचा सोहळा वारकर्यांनी अनुभवला. रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरून भाविकांना घेता आला. या रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर पायी आलेल्या वारकर्यांचा शीण गेला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी (दि. 4) वाखरीत दाखल झाल्या. तत्पूर्वी, दुपारी एक वाजता भंडिशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यापूर्वी संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला होता.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणसाठी बाजीराव विहीरसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती. दुपारी चार वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यापूर्वी मैदानावर वारकर्यांनी फुगड्या, सूरपाट्यांच्या खेळासह भारुडांचे कार्यक्रम सुरू केले होते. रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते.
सायंकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकर्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्यांच्या भोवतीने गोल रिंगण घातले. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वाराने रिंगणाला सुरुवात केली. अश्वांनी तीन फेर्या पूर्ण करत रिंगण पूर्ण केले. रिंगण पूर्ण होताच अश्वांच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.