

सोलापूर : वारीमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाताना भाविकांना त्रास होऊ नये, त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पायी व बाईकवर फिरून देखरेख व नियंत्रण ठेवल्याने यंदा वारकर्यांना चांगल्या व वेळेत सुविधा मिळाल्या. यामुळे यंदा वारी यशस्वी झाली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारी 2024 यशस्वी झाली होती. या वारीत स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याने वारकरी, भाविकांना चांगल्या सुविधा मिळाल्या होत्या. परंतु मागील वर्षीच्या वारीच्या अनुभवावर पालखी, दिंडया, पालखी महामार्ग, वाखरी पालखी तळ, 65 एकर व पंढरपूर शहर या ठिकाणी देण्यात येणार्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक वाटल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये त्या अनुषंगाने नियोजनबद्ध निर्णय घेऊन त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली व ती अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत आहे की नाही याची खात्रीही स्वतः फिल्डवर जाऊन केली. त्यामुळे यंदाची वारीचे नियोजन चांगले झाले आहे.
आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. वारी एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावर नाही, तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते. सहा जुलैला पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, 26 जून ते 8 जुलै 2025 कालावधीत झालेल्या वारीचे नियोजन हे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील काटेकोर नियोजन व धाडसी निर्णयामुळे वारी अधिक सुसंगत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होऊन यशस्वी झाली.
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे हवामान खात्याने वर्तविले होते. उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठी जवळपास 73 टक्के झाला होता. वारीकाळात पावसामुळे उजनी धरण भरल्यास अडचण येणार होती. त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडून उजनी धरणातील पाणीसाठी कमी केले. उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून चंद्रभागा नदी पात्रात पाणी आवश्यक त्या प्रमाणातच राहील यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद स्वतः लक्ष घालून पाण्याचे नियंत्रण व नियोजन केले.