

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्याची लगबग सुरु झाली आहे. पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून ते पंढरपूर येथे यात्रा पार पडेपर्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. याकरीता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. प्रथमच ५ जी वॉकी टॉकी यंत्रणा वापरण्यात येणार आहे. वाहनतळांवर क्युआरकोड लावून भाविकांना क्युआरकोडच्या माध्यमातून शहरातील व परिसरातील इंत्तभूत माहिती मिळणार आहे. तसेच ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, वॉकटॉकीसह बॉम्ब शोधक पथके तैनात करण्यात येणार आहेत. एआयच्या माध्यमातून भाविकांची संख्या देखील मोजण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
आषाढी वारीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डिवायएसपी प्रशांत डगळे, पो,.नि. टि.वाय,. मुजावर व कर्मचारी उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले की, नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा तर अकलूज येथे संत तुकारामांचा पालखी सोहळा दाखल झाल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पालखी मार्ग ते पंढरपूर येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दि. १७ पासून शहराकडे येणारी जड वाहतूक बंद करण्यात येत आहे. तात्पुरती बसस्थाने, वाहनतळे येथे क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. या माध्यमातून भाविकांना आपण पंढरपूरात कुठे आहोत, विठ्ठल मंदिर कुठे आहे. चंद्रभागा नदीकुठे आहे. ६५ एकर कुठे आहे, दर्शन रांगेबाबत व इतर माहिती मिळणार आहे.याचा फायदा भाविकांना होणार आहे. तसेच यंदाच्या यात्रेत प्रथमच ५ जी वॉकी टॉकी यंत्रणा वापरली जात आहे.यामुळे मुख्यमंत्री, व्हिआयपी बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, गर्दी नियंत्रण तसेच आपतकालीन संदेशवहनासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. सुमारे ३५० सीसीसटिव्ही कॅमेरे गर्दीवर लक्ष ठेवून असणार आहेत.
गर्दीचा फायदा घेवून होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच चोरटे शोधण्यासाठी ड्रॉन कॅमेरे, सीसीटिव्ही यंत्रा वापरली जाणार आहे. चेंगराचेंगरीचे सभाव्य स्पॉट फिक्स तेथे बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बंदोबस्तावरील ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संदेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.