

वेळापूर : आषाढी वारीच्या अनुषंगाने आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये. जर उद्भवलीच तर ती सुरक्षितपणे कशी हाताळावी, याबाबतचे प्रात्यक्षिक पोलिस कर्मचार्यांना अनुभवता यावे, म्हणून गुरुवार, दि. 26 रोजी वेळापूर पालखी तळ येथे पोलिसांकडून मॉकड्रील घेण्यात आले. सुरुवातीला नागरिकांना पोलिस कर्मचारी व सुरक्षा अधिकार्यांनी केलेल्या हालचाली पाहून काहीतरी विपरीत घडले असल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र, नंतर समजले की हे मॉकड्रील घेण्यात आले आहे. तेव्हा उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वेळापूर पालखी तळ येथे गुरुवारी दुपारी मॉकड्रील घेण्यात आले. वारी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध यंत्रणा किती सज्ज आहेत. तसेच दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करण्यात येणार्या कारवाईबाबत व उपाययोजनांबाबत पालखी तळ वेळापूर येथे सराव घेण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांनी मॉकड्रीलचे नेतृत्व केले. या मॉकड्रीलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर, जलद प्रतिसाद पथक, अग्निशामक दल, दंगा नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशकपथक तसेच वेळापूर पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.