

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यात्रा कालावधीत चंद्रभागाअ नदीपात्र कायम स्वच्छ राहील, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक व चालकांचे नाव, आसन क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती, परिवहन अधिकारी विजय पाटील, डीवायएसपी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे उपस्थित होते.
आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात. येणार्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. तसेच या काळात पालखी सोहळ्या व्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात, अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनाने तयारी करावी, अशा सूचना मंत्री गोरे यांनी दिल्या.
दरम्यान, प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी कालावधीत मानाच्या पालख्यासह अन्य पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.