

अक्कलकोट तालुका : विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री स्वामी समर्थांचा 148 वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तमीमय वातावरणात झाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या जयघोषाने समर्थ नगरी दुमदुमली. यावेळी हजारो भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.
पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथेही रात्री दोन वाजता काकड आरती झाली. त्यानंतर मंदिर दर्शनाकरिता भक्तांना खुले करण्यात आले.
काकड आरती झाल्यावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते श्री स्वामी समर्थ समाधी मठापर्यंत परंपरेनुसार स्वामी नामाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. मुख्य रस्त्यावर जागो-जागी, चौका-चौकात रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रदक्षिणेत सहभागी झालेल्या भक्तांना थंड पाण्याची सोय व प्रसादाची देखील व्यवस्था जागोजागी विविध संस्थेच्या वतीने व व्यक्तिगतरीत्या करण्यात आली होती. गर्दीच्या अनुषंगाने नित्य होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आलेे होते. दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती झाली. दर्शनाकरिता आलेल्या सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासह सर्व मंदिरात, मठामध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तीव्र उन्हापासून संरक्षण करण्याकरिता मारण्यात आलेल्या मंडपामूळे स्वामी भक्तांना दिलासा मिळाला.