

अक्कलकोट : अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की, जय...! च्या जय घोषात श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी पदुकाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केलेली होती.
ही परिक्रमा गेल्या 4 महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यातून तळकोकणातून पुणे येथे पोहोचली आहे. या नंतर नवी मुंबई, बृहन्मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे. पालखी पादुका परिक्रमेच्या आगमनाने पुणे शहर भक्तीरसात रंगले असून, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष, रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. या प्रसंगी शोभा यात्रा पुणे महानगरपालिकेचे महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते तर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र मानकर, ॲड. कुणाल टिळक, नगरसेविका स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालखी पादुका दर्शन सोहळा, संस्कृती कार्यक्रम, पुरस्कार सोहळा झाला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वामी भक्ती गीते हर्षद कुलकर्णी यांचे तर बाळासाहेब परदेशी यांचे साई नवनाथ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, योगेश तपस्वी यांचा स्वामी गीत सुगंध, स्वरसमर्थ भक्ती गंधर्व मुकुंद बादरायणी यांनी सदर केले. श्री स्वामी समर्थ पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली टाकळकर तर सेवा पुरस्कार दिपक वायकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मोहनबुवा रामदासी, समर्थ रामदास स्वामी मठ क्षेत्र खातगांव, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, पुणे पोलिस उपायुक्त परीमंडल 1 ऋषिकेश रावले,
पुणे येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड, पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला. सामुदायिक महाआरती सोहळा हा पुणे म.न.पा. नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, मसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा भेलके या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला.