

सोलापूर : सततच्या पावसामुळे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव 154 वर्षात पाचव्यांदा ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. अनेक वर्षापासून लुप्त झालेली आदीला नदी यामुळे खूप वर्षांनंतर पुन्हा खळखळती झाली. सध्या ही नदी दुथडी भरून वाहत असल्याने कारंबा नाका येथील या नदीवरील पुल पाण्याखाली गेला. यामुळे बार्शी टोल नाका भागातील अनेक नगरांचा संपर्क तुटला. नदी परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोलापूर शहरमध्ये गेल्या चार, पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. अक्कलकोट, धाराशिव तसेच हिप्परगा तलावाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावात मोठ्या प्रमाणात पाणीचा विसर्ग जाम होत असल्याने हा तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावातील पाणी सांडव्यातून वाहू लागल्याने अनेक वर्षापासून लुप्त पावलेली आदिला नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. नदीचे पाणी सोलापूर शहरात घुसले आहे. लुप्त पावलेली, गटारगंगा झालेली आदीला नदी मात्र खळखळून वाहू लागल्याने सोलापूरकर ते पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हिप्परगा तलावातून चारशे क्युसेस पाण्याचा विर्सग अदीला नदीमध्ये येत आहे.
उपनगरांचा सोलापूरशी संपर्क तुटला
आदीला नदीवरील जुना कारंबा रोड, बार्शी टोल नाक्याकडे जाणारा पांढरे वस्ती जवळचा पूल पाण्याखाली गेला. यामुळे कळके वस्ती, सन्ममित्र नगर, तोडकरी वस्ती, पांढरे वस्ती, संतोष नगर, लक्ष्मी नगर या उपनगरांचा सोलापूरशी संपर्क तुटला आहे.
तहान भागविणारा तलाव
आदीला नदीवर ब्रिटिशांनी 1871 साली हिप्परगा तलाव बांधला. दोन टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला हा तलाव आहे. सोलापूर शहाराची पाण्याची तहान या तलावार भागवली जायची. आत्तापर्यंत 1893, 1990, 1998, 2022 आणि आता 14 ऑगस्ट 2025 असे एकूण पाच वेळा हा तलाव ओव्हरफ्लो झाला.
असा आहे आदिला नदीचा उगम, प्रवास
अनेक वर्षापासून लुुप्त झालेल्या आदीला नदीचा उगम धाराशिव जिल्हातील धालोट गावापासून आहेे. धाराशिव, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापुरातून सोलापूर शहरातील 14 कमान येथून ही नदी वाहात वाहत तेलगाव येथील सिना नदीमध्ये मिसळते. एकूण 47 किलो मीटर लांबीची ही नदी आहे. याच नदीवर ब्रिटिशांनी हिप्परगा तलाव बांधला. अनेक वर्षापासून ही नदी गंटारगंगा झाली होती. हिप्परगा तलाव ओव्हरप्लो झाल्यामुळे खूप वर्षानंतर ही नदी पुन्हा खळखळून वाहू लागली आहे.