विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून होणार सुरू

विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून होणार सुरू

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा ; श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आहेत. हे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दि. 2 जूनपासून श्री. विठ्ठल- रुक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापुर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री. विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी ४५ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला आहे. काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, २ जूनपासून भाविकांच्या हस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शनरांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाईव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष इत्यादी व्यवस्थेचा आढावा घेवून आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेतला. तसेच भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती दिली.

आषाढी यात्रा दि. १७ जुलै रोजी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने मंदिर ‍समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप या ठिकाणी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी दोन हजार कर्मचारी व स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दि. ०७ ते २६ जुलै दरम्यान २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news