सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापुरातील भाजपचे असंतुष्ट चार माजी नगरसेक भाजपमधून अखेर पडले आहेत. या सर्वांची वाटचाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) दिशेने सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. १९९७ पासून महापालिकेवर सलग पाचवेळा निवडून गेलेले, महापालिका स्थायी समितीचे, सभापती आणि सभागृहनेतेपद सांभाळलेले सुरेश पाटील यांच्याकडे भूमिकेकडेही लक्ष वेधले आहे.
भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.
आक्रमक स्वभावाचे म्हणून गणले जात असलेले सुरेश पाटील यांनी तीस वर्षांपूर्वी दिवंगत नेते लिंगराज वल्याळ यांचा हात धरून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु मागील २०१७ साली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी वाढली आणि सुरेश पाटील हे पक्षाचे आमदार विजय देशमुख यांच्यापासून दूर गेले. विशेषतः विजय देशमुख हे पालकमंत्री झाल्यानंतर गटबाजीला जास्त खतपाणी मिळाले. त्यातूनच सुरेश पाटील यांच्यावर चक्क विषप्रयोग करण्यापर्यंत मजल गेली होती. अर्थात पोलीस तपासात अंतिम निष्कर्ष बाहेर येऊ शकला नाही. परंतु कथित विष प्रयोगावरून शहरात भाजपमधील वातावरण दूषित झाले होते. यातच विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या तत्कालीन मंत्र्यांच्या गटबाजीत सुरेश पाटील, नागेश वल्याळ, पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आदी पक्षाच्या वर्तुळाबाहेर फेकले गेले. यात प्रा. निंबर्गी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन थेट काँग्रेसमध्ये जाणे पसंत केल
याच पार्श्वभूमीवर गेल्या महिनाअखेर आषाढी वारीच्या निमित्ताने आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आमदार-खासदारांना घेऊन सोलापुरात आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागेश वल्याळ सुरेश पाटील आदींची भेट घेतली होती. त्यांना बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर अखेर यापैकी वल्याळ व इतर तिघा मजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. सुरेश पाटील हेदेखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांच्या पुढील भूमिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. एकंदरीत या घटनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघात भाजपची अडचण वाढू शकते, असा कयास व्यक्त होत आहे.