गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजन विधी | पुढारी

गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा;  गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (31 ऑगस्ट) ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4 वाजून 48 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादी कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे दाते पंचागकर्तेचे मोहन दाते यांनी सांगितले.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गृहिणींना गौरी आगमनाचे वेध लागतात. शनिवारी (3 सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे. रविवारी (4 सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी मूळ नक्षत्रावर रात्री 8 वाजून 6 मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.

9 सप्टेंबरला दिवसभर विसर्जन मुहूर्त

यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी (9 सप्टेंबर) आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन यादिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.

Back to top button