

पंढरपूर : आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा अविभाज्य भाग. आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदाही एसटी महामंडळाची लालपरी भक्तिभावाने सज्ज झाली आहे.
वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक सोहळा असलेल्या 'वाखरी रिंगणा'च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तब्बल १५० विशेष बसेस सेवेत दाखल केल्या आहेत. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी होणारी गर्दी, वाहतुकीचा ताण आणि विविध मार्गांचा विचार करून या १५० विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांना रिंगणस्थळी पोहोचण्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, तसेच वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतके चालत आलेल्या या भक्तीपरंपरेत एसटी महामंडळाने केवळ वाहतूक सेवा न देता सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणारी लालपरी ही केवळ एक प्रवासी सेवा नसून, विठुरायाच्या भक्तांच्या सेवेत वाहिलेली श्रद्धेची आणि समर्पणाची साक्ष ठरत आहे. यंदाच्या वाखरी रिंगण सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या या विशेष नियोजनाबद्दल वारकरी आणि भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, एसटी महामंडळाच्या या वारकरी-केंद्री उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.