सातारा : कराडातील विखुरलेल्या सत्ताधार्‍यांबाबत उत्सुकता

सातारा : कराडातील विखुरलेल्या सत्ताधार्‍यांबाबत उत्सुकता
Published on
Updated on

कराड; चंद्रजीत पाटील : मागील दोन दशकांपासून कधी सत्तेत तर कधी विरोधात बसावे लागणार्‍या जनशक्ती आघाडीला पुन्हा एकदा फुटीचे ग्रहण लागले आहे. सध्यस्थितीत जनशक्तीतील यादव – जाधव गटाची तोंडे एकमेकांविरोधात आहेत. तर जयवंत पाटील गट कधी कोणासोबत जाईल? हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच मागील निवडणुकीत सर्वाधिक 16 जागांवर विजय मिळवणार्‍या जनशक्ती आघाडीची आगामी निवडणुकीत वाट बिकट झाली आहे.

कराड शहरासह संपूर्ण तालुक्यातील राजकारणात कधी काय होईल? कोण कोणाची सोबत करेल आणि कधी त्यास विरोध करेल? याचा काहीच भरवसा नसतो. अशाच प्रकारच्या लहरी राजकारणाचा मोठा परिणाम विकासकामांवर होतो आणि राजकीय हेवेदाव्यात सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्षच होेते असा कराडकरांचा मागील दोन दशकांतील अनुभव आहे.

सन 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती आघाडीने सर्वाधिक 16 जागांवर विजय मिळवला होता. मात्र निवडणुकीत आठवडाभरातच काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माने आणि स्मिता हुलवान वगळता अन्य 14 नगरसेवकांनी सवता सुभा मांडत आमदार चव्हाण यांच्याशी फारकत घेतली होती. पुढे काही कालावधीनंतर स्मिता हुलवान यांनीही राजेंद्रसिंह यादव यांचीच पाठराखण करत आमदार चव्हाण गटाला सोडचिठ्ठी दिली.

मात्र याच कालावधीत तत्कालीन उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनीही राजेंद्रसिंह यादव यांच्यापासून बाजूला होत भाजप नगरसेवक व नगराध्यक्षांशी जुळवून घेतले होते. मागील काही महिन्यांपासून जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक शिवराज मोरे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. त्याचवेळी माजी नगराध्यक्षा शारदा जाधवही आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅलीत सहभागी झाल्याचे दिसले. तर राजेंद्रसिंह यादव गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी जवळीक वाढल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच सन 2011 पासून दुहीची किड लागलेल्या जनशक्ती आघाडीचे ग्रहण अजूनही कायम असल्याचे समोर आले असून विस्कटलेल्या सत्ताधारी जनशक्ती आघाडीबाबत सर्वसामान्य कराडकर नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

नव्या समीकरणांची नांदी…

मागील दोन दशकातील कराड शहरासह संपूर्ण तालुक्याचा इतिहास पाहता राजकारणात कधी कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो ? हेच दिसून आले आहे. कराड शहरात तर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 2011 साली मजबूत मानल्या जाणार्‍या जनशक्तीची सर्वप्रथम शकले उडून यशवंत विकास आघाडीचा उदय झाला. याच कालावधीत लोकशाही आघाडी बळकट झाली होती. मात्र मतभेदांमुळे यादव गट 2016 साली बाजूला गेला होता. मात्र सध्यस्थितीत लोकशाही आघाडीने विरोधकांमधील काही मोठे मासे गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी जनशक्तीमधील मतभेदांचे प्रदर्शन होत असल्याने आता मागील दोन नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच यावेळी सुद्धा नवी समीकरणे पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news