

सातारा : मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूरवीर सरदारांनी रक्त सांडून उभा केलेला इतिहास नकाशातून वगळला आहे. तसेच, आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा नकाशाचा समावेश करावा; अन्यथा पुणे-मुंबईसह राज्यभर आंदोलन छेडले जाईल. पुढील 15 दिवसांत मागण्यांवर तोडगा न निघाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा श्रीमंत वृषालीराजे भोसले यांनी दिला.
‘एनसीईआरटी’कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ मराठ्यांची राजधानी साताऱ्यात महाराष्ट्र धर्म मोर्चा काढला. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वृषालीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला.
‘नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही, इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही,’ असे फलक घेऊन शाळकरी विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते.