सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारची गादी ही छत्रपतींची राजगादी आहे. अगामी विधानसभा निवडणुकीत आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी ग्वाही संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आ. शिवेंद्रराजेंनी मध्यस्थी केल्यास सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला 113 आमदार पाडणार असे वक्तव्य केले आहे. याच अनुषंगाने सातारा विधानसभा निवडणुकीबाबत जरांगेंना छेडले असता ते म्हणाले, सातारची गादी ही छत्रपतींची गादी आहे. या गादीविरोधात कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. छत्रपतींच्या गादीचा नेहमीच आदर आहे. विधानसभेला या गादीविरोधात आमचा उमेदवार नसेल. आम्हाला मराठा समाजाचे कल्याण करायचे आहे. त्यामुळे आम्ही कधीही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. शिवेंद्रराजेंशी फोनवरून याबाबत चर्चा करणार आहे. आम्हाला कुणीही आरक्षण द्यावं हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आम्ही शिवेंद्रराजेंना सांगतो 29 ऑगस्टपूर्वी निर्णय घ्या. त्यानंतर आम्ही ऐकणार नाही. आम्ही कुणासाठी समाजाला सोडून देऊ शकत नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.