

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा धोम धरणा खालचा रस्ता अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. सामाजिक व कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारा महत्त्वाचा दुवा असलेला हा रस्ता पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
हा रस्ता धोम धरणाच्या दोन्ही बाजूंवरील गावांना जोडणारा आहे. विशेषतः माहेरवाशीणी व नातेवाईकांमधील संपर्कासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून प्रवास करताना घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच, या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्र्यांपर्यंत व आमदार मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पश्चिम भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. काम केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवले जात असल्याचा आरोप होत आहे.