सातारा, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वातावरणातील बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यातून अनेकजण व्हायरल इन्फे क्शन, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अन् जुलाब यासारख्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह बहुतांश खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कधी ऊन, तर कधी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसातील गारवा आणि दिवसभरात बदलत जाणार्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावत आहे. शिवाय सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने दुष्परिणाम त्याचे मानवी आरोग्यावर जाणवत आहेत. सततच्या या वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे आजार वाढत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच ऊन आणि काही वेळा पाऊसही पडतो. या बदलाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. या बदलांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सातारा शहरातील काही भागासह ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलटी-जुलाबसारखे आजार होत आहेत. या दिवसांत पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. या वातावरणात लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सर्दी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब असे आजार होतात. परिसरात कचरा, घाण साचू देऊ नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे वारंवार देण्यात येत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका आहे.